गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१९: लग्नकार्य पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना पोलिस शिपाई असलेल्या नवरदेवाने वधूसाठी घेऊन ठेवलेले दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी(ता.१८) गडचिरोलीपासून ६ किलोमीटर अंतरावरील वाकडी येथे घडली. या घटनेमुळे गावात भीती निर्माण झाली आहे.
वाकडी येथील घनश्याम रोहनकर यांचे चिरंजीव नयन हे पोलिस विभागात शिपाई पदावर कार्यरत असून, २२ मे रोजी साक्षगंध व २३ तारखेला त्यांचे लग्न ठरले आहे. त्यासाठी त्यांनी कापड व दागिन्यांची खरेदी करुन आलमारीत ठेवले होते. गुरुवारी रात्री रोहनकर कुटुंबीय अंगणात झोपी गेले. सर्वजण गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी छतावरुन घरात प्रवेश केला. त्यानंतर ते आलमारीतील चार तोळे सोने व २ हजार रुपये घेऊन पसार झाले. मात्र, चोरट्यांनी नवीन कपड्यांना हात लावला नाही. आज सकाळी रोहनकर कुटुंबीय झोपेतून उठताच त्यांना आलमारी तोडल्याचे लक्षात आले. तक्रारीनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे, पोलिस निरीक्षक विजय पुराणिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आमदार डॉ.देवराव होळी यांनीदेखील वाकडी येथे जाऊन रोहनकर कुटुंबीयांची भेट घेतली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ऐन लग्नाच्या तयारीच्या वेळी दागिन्यांची चोरी झाल्याने लग्नघरी नाराजीचे वातावरण आहे.