गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१४ : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील दोन युवकांचा विषारी दारू प्याल्याने मृत्यू झाल्याची घटना काल (ता़१३) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली़ संदीप इजगमकर(२२) व पंकज सोनटक्के(२२) अशी मृत युवकांची नावे असून ते आलापल्ली येथील रहिवासी आहेत.
संदीप इजगमकर व पंकज सोनटक्के हे दोघे काल रात्री बाहेरगावावरून मद्यप्राशन करून आले. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांनी महाराष्ट्र बँकेसमोर मोटारसायकल थांबवली. लागलीच दोघेही खाली कोसळले़ त्यानंतर नागरिकांनी त्यांना डॉ. सलुजा यांच्या दवाखान्यात नेले. तेथे तपासणी केली असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले़ माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा केला़ त्यानंतर आज(ता़१४) शवविच्छेदन करण्यात आले़ त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, विषारी दारू प्याल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे़ विषारी दारू प्याल्याने त्यांचा मृत्यू झाला की, त्यांचा खून करण्यात आला, याबाबत गावात चर्चेला उधाण आले आहे. अहेरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.