गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१४ :अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा गावानजीकच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबडाबाजारावर वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू, तर ५ जण जखमी झाल्याची घटना आज (ता.१४) संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. नीलेश तुळशीराम झरपाला (१२) व विजय पोचम कोठारे (३०) रा़रसपल्ली अशी मृतांची नावे आहेत.
आज जिमलगट्टानजीकच्या जंगलात कोंबडाबाजार सुरू असल्याने शौकिनांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी वीज कोसळल्याने नीलेश झरपाला व विजय कोठारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य ५ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार दीपक आत्राम यांनी जखमींची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत दिली.