गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२३: वृक्षांची संख्या कमी झाली, तर भविष्यात ऑक्सिजनही विकत घ्यावे लागेल. कुणावरही ही पाळी येऊ नये म्हणून वृक्षारोपणाची चळवळ हाती घेण्यात आली आहे. वृक्षारोपण हा केवळ उपक्रम नाही, तर पृथ्वी वाचविण्यासाठी चालविलेला तो यज्ञ आहे, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले.
राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड योजनेच्या जनजागृतीसाठी ग्रीन अर्थ आर्गनायझेशनद्वारा आ.प्रा.अनिल सोले यांच्या नेतृत्वातकाढण्यात आलेल्या वृक्षदिंडीचे काल गडचिरोलीत आगमन झाले. त्यानंतर आज आयोजित एका कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन खा.नेते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, आ.प्रा.अनिल सोले, आ. डॉ देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, मुख्य वन संरक्षक डब्लू. आय.यटबॉन, भाजपाचे महामंत्री रवींद्र ओल्लावार, भाजपा नेते बबली मेश्राम, किशोर पाटील, विजय फडणवीस, प्रशांत कामडी, देवा डेहनकर, नगरसेवक प्रमोद पिपरे आदी मान्यवर उपस्थित होते.
वृक्षदिंडी ही लोकचळवळ असून, ते एक ईश्वरी कार्य आहे, असे आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले. आ.प्रा.अनिल सोले म्हणाले की, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ४ कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा शासनामार्फत केली. या कार्यात वृक्षदिंडी काढून ग्रीन अर्थ आर्गनायझेशन हातभार लावत आहे. ही दिंडी पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत फिरुन जनजागृती करीत आहे.
आज आपण वृक्ष लागवड केली नाही तर येणाऱ्या काळात जीवन जगणे कठीण होऊन जाईल. पूर्वी आपणास इंधन आणि पाणी निसर्गातून सहज मिळत होते. परंतु आज आपल्याला इंधन आणि पिण्याचे पाणी विकत घेण्याची गरज भासत आहे. त्यासाठी वृक्षलागवड हाच पर्याय असल्याचे आ.प्रा.सोले म्हणाले. खा.अशोक नेते म्हणाले की, आपण एका दिवशी ऑक्सिजन घेत असतो त्याची किंमत २५ हजार रुपये आहे. झाडांची संख्या कमी झाली तर ऑक्सिजन आपल्याला विकत घेण्याची पाळी येऊ शकते. ऑक्सिजन मिळाले नाही तर आपण २ मिनिटेसुद्धा जीवंत राहू शकत नाही. त्यामुळे झाडे लावण्याचा संकल्प करा, असे आवाहन खा.नेते यांनी केले.
४ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमाचे जिल्ह्याचे लक्ष्य आम्ही पूर्ण करु, असा विश्वास मुख्य वनसंरक्षक डब्लू.आय.यटबॉन यांनी व्यक्त केला. आतापर्यत २५ लाख खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले असून, त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत मिळत आहे. वृक्षलागवडीबाबत वनविभाग पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करीत असल्याची माहिती श्री.यटबॉन यांनी प्रास्ताविकातून दिली.
या कार्यक्रमात झाड लावणे व झाडाची कत्तल करणार नाही, अशी शपथ उपस्थितांना देण्यात आली. वनरक्षक अरुण पेंदोरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.