गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता..२६: देशातील प्रत्येक नागरिकास समान अधिकार व सोयी सुविधा निर्माण करुन देण्याचे, तसेच दीन, दुबळे, गरीब व वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शाहू महाराजांनी केले, असे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी आज केले.
छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणुन राज्यभर साजरा करण्यात येतो. यानिमित्त डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, नगरसेवक प्रमोद पिपरे, केशव निंबोर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, समाजकल्याण अधिकारी पेंदाम, श्री.पांडे, नंदू काबरा उपस्थित होते.
आ.होळी पुढे म्हणाले, शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दलित व उपेक्षित समाजातील जनतेला आरक्षण सुरु केले. समाजातील विषमता दूर करुन समाज एकसंध व्हावा व एकत्रितपणे चालावा ही शाहू महाराजांची भूमिका होती. प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक विषमता दूर करण्याचे काम शाहू महाराजांनी केले. आता जातीय विषमता दूर करण्यासाठी समाजात बंधुत्वाची भावना निर्माण केली पाहिजे. त्यासाठी शाहू महारांजापासून प्रेरणा घेऊन समाजातील प्रत्येक घटकाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर म्हणाल्या की, शाहू महाराजांनी बहूजन समाज, उपेक्षित व वंचित समाजासाठी मोठे कार्य केले. त्यांचे कार्य समाजाने विसरु नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक नावाचे साप्ताहिक सुरु केले होते. काही कालावधीनंतर ते बंद पडले असता शाहू महाराजांनी आर्थिक मदत केल्यामूळे पूर्ववत साप्ताहिक सुरु झाले. शाहू महाराजांच्या कार्यामुळे उपेक्षित लोकांना मोठया शिक्षणाची संधी मिळाली, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष योगीता पिपरे, प्रकाश गेडाम यांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमापूर्वी सकाळी इंदिरा गांधी चौकातून समता दिंडी काढण्यात आली. त्यात वसंत विद्यालय, शिवाजी हायस्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर्स, कार्मेल हायस्कूल, भगवंतराव हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थी सहभागी झाले होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने अपंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गत नरेश लहानू नारनवरे व आरती नारनवरे या दाम्पत्यास आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच समाज कल्याण विभागाच्या निवासी शासकीय शाळेतून विशेष प्रावीण्य प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या प्रफुल बापू आलमवार व किरण समय्या जनगाम यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे संचालन शिवाजी पाटील, प्रास्ताविक सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, तर आभार समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी मानले.