देसाइगंज, ता.१२: गेल्या तीन-चार महिन्यांपासून देसाईगंज व आरमोरी तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जंगलात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला पकडण्यात अखेर आज वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा व आरमोरी तालुक्यातील रवी, कासवी, उसेगाव, मुल्लूरचक इत्यादी गावानजीकच्या जंगलात गेल्या तीन-चार महिन्यांपासून पट्टेदार वाघिणीने धुमाकूळ घातला होता. यापूर्वी कोंढाळा येथील लवाजी मेश्राम व रवी येथील वामन मरापे यांचा वाघिणीने बळी घेतला. त्यामुळे त्या भागात वाघाची प्रचंड दहशत होती. २९ जुलैला सकाळी रवी येथील शिवदास चौके या शेतकऱ्यावरही वाघिणीने हल्ला केला होता. दरम्यानच्या काळात वनविभागाने वन्यजीव विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून वाघाला पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही अडचणींमुळे त्यात त्यांना यश आले नव्हते.
आज सायंकाळी ६ वजताच्या दरम्यान ताड़ोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, शूटर श्री.मराठे, वडसाचे वनपरिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार, आरमोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी श्री.तांबटकर, तसेच वन विभागाचे २० वनमजूर व कर्मचारी अशा ४० जणांच्या चमूने रवी व अरसोडा गावाच्या मध्ये कक्ष क्र. ६७ मधील जंगलात नरभक्षक वघिणीला बेशुद्ध करण्यात यश मिळविले. जेरबंद झालेली वाघिण साडेतीन वर्षे वयाची असल्याची माहिती वन परिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार यानी दिली. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.