गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.९: ग्रंथ हे सर्वोत्तम ज्ञान देणारे साधन आहे. काळ बदलला तरी ग्रंथांचे महत्व कमी होणार नाही. मात्र ग्रंथालयांनी बदलत्या काहानुसार नव्या तंत्राचा वापर आपल्या कामकाजात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित 'ग्रंथालय सुसुत्रीकरण' या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील शिवाजी ग्रंथालयात ही कार्यशाळा झाली. या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी तसेच शिवाजी ग्रंथालयाचे सचिव व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जगदीश म्हस्के उपस्थित होते.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी म्हणाले की, ग्रंथालयाचे दैनंदिन कामकाज, वाचन प्रेरणा दिन घेण्यात यावे. तसेच ग्रंथोत्सव २०१७ आयोजित करण्याबाबत या कार्यशाळेत चर्चा करुन ग्रंथालयात उदभवणाऱ्या विविध अडचणींचे निराकरण करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रंथालयातील रेकॉर्ड अद्यावत कसे ठेवावेत याबाबत सादरीकरणाव्दारे माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हस्के यांनी ग्रंथालय चळवळ कशी टिकवून ठेवायची याबाबत सविस्तर माहिती दिली. व ग्रंथालय सुसज्ज ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करुन जर आपण ही काळजी घेतली नाही तर निर्माण होणारी अडचण आपण सोडवू शकणार नाही, असे सांगितले.
याच ठिकाणी लोकराज्य मेळावा घेण्यात आला. येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित पुस्तकांच्या विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आला होता. 'महाराष्ट्र वार्षिकी' या पुस्तकात असणारी माहिती स्पर्धा परिक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असून ग्रंथालयानी किमान प्रत्येकी ५ पुस्तके घ्यावीत, असे आवाहन दैठणकर यांनी याप्रसंगी केले. या लोकराज्य मेळाव्यात माहिती कार्यालयाचे कर्मचारी प्रभाकर कोटरंगे, वामन खंडाईत, स्वप्नील महल्ले, प्रवीण ठाकरे, गुरुदास गेडाम उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन जिल्हा ग्रंथालय संघ गडचिरोलीचे अध्यक्ष, प्राचार्य भाऊराव पत्रे यांनी केले. श्री. कुंबडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जिल्हयातील सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील सूर्यकांत भोसले तसेच ग्रंथपाल रवी समर्थ यांनी अथक परिश्रम घेतले.