गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१७: वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. संपामुळे गडचिरोली व अहेरी आगारातील सुमारे तिनशे फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून, दोन्ही आगारांचे सुमारे २३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
गडचिरोली आगारातील ४९५, तर अहेरी आगारातील २९५ कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यात चालक, वाहक, मेकॅनिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे गडचिरोली आगारातून सुटणाऱ्या २०० फेऱ्या व बाहेरुन येणाऱ्या बसेस अशा एकूण ४०० बसफेऱ्या आणि अहेरी आगारातील १०९ व बाहेरुन येणाऱ्या बसेस अशा एकूण ३८० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे आज सकाळपासून दोन्ही आगारांमधून कुठेही बसेस गेल्या नाहीत. अहेरी येथे काल रात्री अन्य आगारातून मुक्कामी आलेल्या बसेस आज सुटल्या नाहीत. आज दिवसभरात बसेस न सुटल्याने अहेरी आगाराचे सुमारे साडेसात लाख, तर गडचिरोली आगाराचे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एसटी कामगार संपावर गेल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. दिवाळीसाठी बाहेर गावावरुन आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. याचा फायदा घेत खासगी प्रवासी वाहतूकदारांनी आपली 'दिवाळी' साजरी केली.