गडचिरोली | --°C | --°C |
अहेरी, ता.१८: सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांची मजुरी न मिळाल्याने संतप्त झालेले जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी थेट तेलंगणा राज्यात जाऊन कंत्राटदारांना जाब विचारला.
यंदाच्या तेंदू हंगामात अहेरी तालुक्यातील वेलगुर आणि किष्टापूर ग्रामपंचायतींतर्गत नवेगाव, वेलगूर, टोला, एलचिल, कल्लेम, तोंडेल, मद्दीगुडम, शिलिंगपूर, मैलाराम, बोटलाचेरु व किष्टापूर या गावातील तेंदू मजुरांनी तेंदूपाने तोडण्याचे काम केले होते. परंतु सहा महिने होऊनही संबंधित कंत्राटदाराने त्यांना मजुरीची रक्कम दिली नाही. परिणामी गोरगरीब मजुरांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे संतप्त झालेले जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तेलंगणा राज्यातील वरंगल जिल्ह्यातील मोहम्मद गौसिंद्दीनपल्ली हे गाव गाठले. तेथे त्यांनी तेंदू कंत्राटदार श्री.नागराज यांच्याशी दीर्घ चर्चा करुन मजुरीबाबत विचारणा केली. यावर कंत्राटदाराने सर्व मजुरांची मजुरीची रक्कम देण्याचे मान्य केले. उद्या(ता.१९) सर्वांना दोन दिवसांची मजुरी मिळणार आहे. उर्वरित रक्कम येत्या पंधरा दिवसात देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले.
यामुळे मजुरांच्या दिवाळीत थोडासा गोडवा आला आहे. याप्रसंगी उमेश मोहुर्ले, रवी सल्लमवार, मनोहर पाटील, माजी सरपंच भगवान आत्राम, महेश अर्का,अशोक चालूरकर, सीताराम मेश्राम, हरी आत्राम, संतोष वसाके, दलसू मडावी, मारोती ओडेंगवार, नरेश मंटकवार, अरुण दुर्गे, साईनाथ नागोसे,अशोक कोटरंगे,सुरेश येरमे आदी उपस्थित होते.