गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१९: देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील धंनजय नाकाडे आश्रमशाळेत दहाव्या वर्गात शिकणारा प्रकाश अशोक मडावी(१५) हा विद्यार्थी ५ नोव्हेंबरपासुन बेपत्ता असल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ माजली आहे.
मुख्याध्यापक देवेंद्र नाकाडे यांनी ७ नोव्हेंबर रोजी प्रकाश मडावी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. या तक्रारीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी भोजनाच्या वेळी हजेरी घेत असताना प्रकाश मडावी बेपत्ता असल्याचे समजले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, तसेच नातेवाईकांनाही विचारपूस केली. परंतु प्रकाश आढळला नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.
यासंदर्भात देसाईगंज पोलिसांनी मुख्याध्यापकांच्या तक्रारीची नोंद घेतली आहे. मात्र, प्रकाशच्या वडिलांची तक्रार घेतली नाही, अशी माहिती आहे. प्रकाश मडावी याच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचे निधन झाले. त्यामुळे लहानपणापासूनच तो मुरमाडी येथे आपल्या आजीकडे राहत असून वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. ८ व्या वर्गापासून प्रकाश कोकडी येथील धंनजय नाकाडे आश्रमशाळेत शिकत आहे.
मागील वर्षीसुद्धा या आश्रमशाळेतून प्रकाश पळाला होता व गस्तीदरम्यान तो पोलिसांना मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा आश्रमशाळेत आणून सोडले होते. आताही तो दिवाळीच्या सुटीनंतर १ नोव्हेंबरला आश्रमशाळेत आला व ५ तारखेला शाळेतून पळाला, अशी माहिती मुख्यध्यापक देवेंद्र नाकाडे यांनी दिली.
दरम्यान, १३ दिवसांपासून पोलिस व शाळा प्रशासन मुलाचा शोध घेत नसल्याचा आरोप प्रकाशचे वडील अशोक मडावी यांनी केला आहे. दरम्यान, प्रकाश नेमका कशामुळे शाळेतून पळाला, याविषयी चौकशी होणे गरजेचे आहे. मागच्या वर्षी शाळेत प्रकाशला एका शिक्षकाने लाकडी रुळाने मारहाण केल्याने प्रकाशने शाळेतून पलायन केले होते, असे सांगितले जात आहे. आताही त्याच्या बेपत्ता होण्यामागे मारहाणीचेच कारण तर नाही ना, प्रकाश पळाला त्या दिवशी शाळेत नेमके काय झाले होते, असे नानाविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत..