गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२०: समाजकल्याण विभागाद्वारे संचालित शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचे निदर्शनास येताच संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना घेराव घेराव घालून जाब विचारला.
समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याची माहिती मिळताच काल युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वसतिगृहात जाऊन ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात उडी घेऊन अन्नत्याग केला. यावेळी कार्यकर्त्यांनी अन्नपदार्थांची पाहणी केली असता अनेक पदार्थ मुदतबाह्य असल्याचे आढळून आले.
त्यानंतर आज युवक काँग्रेसचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते समाजकल्याण विभागाच्या कार्यालयावर धडकले. त्यांनी सहायक आयुक्त श्री.मोहतुरे यांना घेराव घालून धारेवर धरले. विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ दर्जाचे भोजन देऊन दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली. शिवाय वसतिगृहात पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके उपलब्ध करुन द्यावीत, नादुरुस्त संगणकांची दुरुस्ती करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या. यावेळी श्री.मोहतुरे यांनी उत्कृष्ठ भोजन व पेयजलाची समस्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव एजाज शेख, आशिष कन्नमवार, विधानसभाध्यक्ष अमोल भडांगे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड, कवडू कुळमेथे, गौरव आलाम, आशिष नरुले, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनिकांत मोटघरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी झाले होते.