गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२८: सशस्त्र नक्षल्यांनी एका युवकाची गळा चिरुन हत्या केल्याची घटना आज एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांभिया पोलिस ठाण्यांतर्गत झारेवाडा येथील जंगलात उघडकीस आली. मनोज राजू नरोटे रा.झारेवाडा, असे मृत युवकाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गट्टा जांभिया पोलिस ठाण्यापासून १० किलोमीटर अंतरावरील झारेवाडा गावानजीकच्या जंगलात आज मनोज नरोटे याचा मृतदेह आढळून आला. ३ वर्षांपूर्वी झारेवाडा येथील रमनी आत्राम या महिलेचा खून झाला होता. तेव्हापासून मनोज नरोटे फरार होता. २ महिन्यांपूर्वीच तो गावात परतला होता, अशी माहिती आहे. आज त्याचा मृतदेह आढळून आला. रमनी आत्रामच्या खुनात मनोज नरोटचा सहभाग असल्याचा काही जणांचा संशय होता. त्यामुळे मनोजची हत्या नक्षल्यांनी केली की अन्य कुणी, याबाबत साशंकता आहे.
येत्या २ डिसेंबरपासून नक्षल्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मीचा १७ वा स्थापना सप्ताह आहे. या पार्श्वभूमीवर, नक्षल्यांनी संपूर्ण जिल्हाभरात उच्छाद मांडला आहे. चालू आठवड्यात नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन ३ युवकांची हत्या केली. शिवाय कोटगूल येथील भूसुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे, तर टवे येथील जंगलात झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान मंजुनाथ शिवलिंगप्पा हे शहीद झाले. या दोन घटनांमध्ये चार पोलिसही जखमी झाले आहेत. त्यामुळे झारेवाडा येथील मनोज नरोटेच्या हत्येत नक्षल्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. मात्र, घटनास्थळी नक्षल्यांनी कुठल्याही प्रकारचे पत्रक न टाकल्याने साशंकता आहे.