गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.३०: ज्या संस्था फक्त नोंदणीकृत आहेत, परंतु त्यांचे काम सुरू नाही अशा जिल्ह्यातील ४८६८ संस्थांना त्यांच्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यासंदर्भात सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने नोटीस बजावली आहे.
गडचिरोली येथील अधीक्षक(न्याय)सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय यांनी यासंदर्भात संबंधित संस्थांना नोटीस बजावली आहे. यात ९५ टक्के महिला मंडळे असून, अनेक शैक्षणिक संस्था व समित्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम २२(३अ)अन्वये संबंधित संस्थांना नोटीस बजावून चौकशी सुरु करण्यात आली आहे. विश्वस्तांनी मागील ५ वर्षांची हिशोब पत्रके सादर न करणे तसेच न्यासाचे बदल अर्ज दाखल न करणे, या कारणांसाठी आपल्या संस्थेची नोंदणी रद्द का करण्यात येऊ नये, असा प्रश्न सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाने विचारला आहे. ३० दिवसांच्या आत
न्यास नोंदणी कार्यालयात उपस्थित राहून आपला खुलासा सादर करावा, असेही कार्यालयाने सांगितले आहे.
यामुळे केवळ कागदोपत्री संस्था चालविणाऱ्यांना चपराक बसली असून, आता नवीन नोंदणी करताना संबंधित विभाग मोठी काळजी घेणार आहे. धर्मादाय कार्यालयाकडून जुन्या विश्वस्त बदल अर्जाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे. तसेच बदल अर्ज निकाली काढण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. तसेच ज्या संस्था फक्त नोंदणीकृत आहेत परंतु त्यांचे काम सुरू नाही, अशा जिल्ह्यातील ४८६८ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून, ही यादी धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.