गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.७: दारूबंदीचे समर्थन करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी मद्यमुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले आहे.
हल्लाबोल आंदोलनादरम्यान यवतमाळ येथील महिलांना भेटून यवतमाळ जिल्हा दारूमुक्त व्हावा, या मागणीला खासदार सुप्रिया सुळे यांनी खंबीर पाठिंबा जाहीर केला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांची मागणी पूर्ण करेल, असे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर, श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी खा.सुप्रिया सुळे यांना पत्र पाठवून मद्यमुक्त महाराष्ट्रासाठी खा.सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी दारूबंदीला समर्थन जाहीर करताच, त्यांचा आदर्श घेऊन माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील यांनी 'राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर येताच एका दिवसात यवतमाळ जिल्हयाची दारू बंदी करू', असे जाहीर करुन विधीमंडळात अशासकीय ठराव मांडण्याचे आश्वासनही दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी "आम्ही यवतमाळ जिल्हा दारूबंदीच्या प्रश्नावर येत्या अधिवेशनात प्रश्न मांडू' असे वचन दिले, दारूबंदीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे श्रीमती गोस्वामी स्वागत केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी दारूबंदीला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्रात दारूबंदीसाठी प्रचंड सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण तसेच राष्ट्रवादी काँग्रेससारख्या मोठया पक्षांनी गोर-गरीब महिलांच्या या लढयाला भक्कम साथ दिल्यामुळे सर्वं महिलांच्या मनात 'मद्यमुक्त महाराष्ट्राची' आशा पल्लवीत झाली आहे, याकडे अॅड. गोस्वामी यांनी त्यांचे लक्ष वेधले.
आज प्रत्येक पक्षात दारूबंदीला समर्थन देणारे आमदार आहेत, हे नाकारता येत नाही. भाजपाचे सद्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे, काँग्रेसचे बुलढाण्याचे आमदार राहूल बोंद्रे यासारखे नेते दारूबंदीच्या मुद्यावर सकारात्मक आहेत. राजकारण व पक्षाचे पलीकडे जाऊन दारूबंदीच्या मुद्यावर सर्व पक्षाचे आमदार एकवटले तर मद्यमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होऊ शकते, असेही अॅड.पारोमिता गोस्वामी यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यानी सकारात्मक दृष्टिकोनातून पुढाकार घ्यावा आणि सर्व पक्षाचे दारूबंदीला अनुकूल असलेले आमदार, विषेशतः महिला आमदार यांची एकजुट तयार करून, संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदीसाठी नेतृत्व करावे, असे आवाहन अॅड. गोस्वामी यांनी केले. गुजरात आणि बिहारनंतर महाराष्ट्र आपल्या नेतत्वाखाली संपूर्ण दारूमुक्त होऊ शकतो, याकडे गोस्वामी यांनी सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधले. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनीच पुढाकार घेऊन गडचिरोली जिल्हयाची दारूबंदी करून महिलांची मागणी पूर्ण केली होती, त्यांनीच महाराष्ट्रात महिला धोरण आणले. त्यानंतर आपण स्वतः 'बेटी बचाव'चा नारा देत हे अभियान प्रभावीपणे राबविले. शरद पवार यांचा वारसा पुढे घेउन जायचे असेल तर आपल्या नेतृत्वात यवतमाळ आणि सोबतच संपूर्ण महाराष्ट्राची दारूबंदी एक महत्वाचे पाउल ठरेल, असा आशावाद अॅड. गोस्वामी यांनी व्यक्त केला.