गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२७: देशातील लोकसंख्येच्या अवघ्या १.७ टक्के भारतीयांनी २०१५-१६ मध्ये प्राप्तीकर भरला आहे. तुलनेत या कर निर्धारण वर्षांत प्राप्तीकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या मात्र वाढली असून, ती ४.०७ कोटी झाल्याचे प्राप्तीकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
प्राप्तीकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०१५-१६ या कर निर्धारण वर्षांत २.०६ कोटी भारतीयांनी प्राप्तीकर भरला आहे. याच वर्षांत विवरण पत्र भरणाऱ्या करदात्यांची संख्या मात्र ४.०७ कोटी नोंदली गेली आहे. आधीच्या कर निर्धारण वर्षांतील ३.६५ कोटी विवरण पत्र भरणाऱ्या करदात्यांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. २०१४-१५ मध्ये विवरण पत्र भरणाऱ्यांची संख्या ३.६५ कोटी होती, तर करदात्यांची संख्या १.९१ कोटी होती.
असे असले तरी २०१५-१६ या कर निर्धारण वर्षांत व्यक्तिगत करदात्यांची रक्कम आधीच्या वर्षांतील १.९१ लाख कोटी रुपयांवरून १.८८ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आली आहे. यंदा प्राप्तीकर भरणाऱ्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत १.७ टक्के, तर प्राप्तीकर विवरण पत्र भरणाचे प्रमाण ३ टक्के राहिले आहे. २.०१ कोटी लोकांनी कोणताही कर भरला नाही, तर ९,६९० जणांनी एक कोटींपेक्षा अधिक रकमेचा कर भरला आहे. १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक प्राप्तीकर भरणारी केवळ एकच व्यक्ती होती. या व्यक्तीने २०१५-१६ या कर निर्धारण वर्षांत २३८ कोटी रुपये कर भरला आहे.
२.८० कोटी कर विवरणपत्र भरणाऱ्यांकडून सर्वाधिक १९९३१ कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आले आहेत. त्यांनी ५.५ लाख ते ९.५ लाख रुपये करापोटी भरले आहेत. १.५० लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम भरणाऱ्या विवरणपत्रधारकांची संख्या १.८४ कोटी राहिली आहे.
४.०७ कोटी प्राप्तीकर विवरणपत्रधारकांपैकी ८२ लाख भारतीयांनी २.५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न नोंदविले आहे. सध्याच्या कर रचनेत या रकमेपर्यंत कोणताही प्राप्तीकर लागू नाही. आधीच्या वर्षांत प्राप्तीकर विवरणपत्र भरणाऱ्या ३.६५ कोटी भारतीयांपैकी २.५ लाख रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची संख्या १.३७ कोटी होती.
(साभार: द इकॉनॉमिक टाईम्स)