गडचिरोली | --°C | --°C |
एटापल्ली,ता.२९: शेतकरी, मजूर व तालुकावासीयांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शासनाला जागे करण्यासाठी आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, पंचायत समिती सदस्य शालिक गेडाम, नगर पंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम, काँग्रेसच्या शेतकरी आघाडीचे तालुकाध्यक्ष हरिदास टेकाम आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
दुपारी १२ वाजता राजीव गांधी हायस्कूलच्या प्रांगणातून मोर्चास सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी विविध घोषणा देत एसडीओ कार्यालय गाठले. यंदा उत्पादनात ६० टक्के घट झाल्याने एटापल्ली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपयांची मदत द्यावी, अतिक्रमणधारकांना वनजमिनीचे पट्टे त्वरीत द्यावेत, जारावंडी-कसनसूर-एटापल्ली रस्त्याची दुरुस्ती करावी, कांदोळी व झुरी नाल्यावर पूल बांधकामास निधी उपलब्ध करुन द्यावा, तसेच बससेवा सुरु करावी, पिपली बुर्गी येथील मंजूर झालेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरु करावे, जारावंडी येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरु करावी, शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनांच्या लाभासाठी जातवैधता प्रमाणपत्राची अट शिथिल करावी, सरसकट पीक कर्ज माफ करावे, आदिवासी विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी, वीजपुरवठा सुरळीत करावा इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.