गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.५: येथे जिल्हा पोलिस विभागातर्फे आयोजित रोजगार मेळाव्यास युवक, युवतींनी प्रचंड प्रतिसाद दिला. या मेळाव्यात तब्बल ८२४ बेरोजगारांना नोकरीचे नियुक्तीपत्र दिल्याची माहिती पोलिस विभागातर्फे देण्यात आली.
पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. सीआरपीएफचे(अभियान)उपमहानिरीक्षक टी.शेखर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक(नक्षलसेल)महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक(प्रशासन)महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक(अभियान)डॉ.हरी बालाजी उपस्थित होते.
यावेळी पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख म्हणाले की, या रोजगार मेळाव्यास टाटा मोटर्स, नवभारत, बायोकेअर, आयसीआयसीआय बँक इत्यादीसारख्या १८ नामांकित कंपन्यांना पाचारण केले असून, या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगाराची नामी संधी गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींना प्राप्त झाली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे म्हणाले की, मेळाव्यामुळे नक्षलग्रस्त भागातील युवक, युवतींना रोजगार मिळेल व भविष्यातील त्यांच्या वाटचालीस फायदा होईल. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नोकरीसाठी निवड झालेल्या ७ उमेदवारांना अंकुश शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्तीपत्र मिळालेल्या प्रशांत दिघोरे याने आपल्याला नोकरीची गरज होती व पोलिस विभागाने ती गरज पूर्ण केली, असे सांगितले. या रोजगार मेळाव्यात ४५०० युवक, युवतींनी आपली नावे नोंदविली होती. त्यापैकी ४२०० उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या, तर ८२४ उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीचे पत्र देण्यात आले आणि ६४८ उमेदवारांना नोकरीसाठी प्रतीक्षायादीत टाकण्यात आले. अशाप्रकारे १४७२ जणांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध झाली, असे विभागातर्फे सांगण्यात आले.