गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२५: केंद्र व राज्यातील भाजप सरकारने संविधान बदलण्याचा घाट घातला असून, लोकशाही धोक्यात आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला असून, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी गडचिरोली येथे संविधान व लोकशाही बचाव रॅलीचे आयोजन केले आहे.
२६ जानेवारीला सकाळी ९ वाजता गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातून ही रॅली निघणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सध्या देश व राज्यात भाजपचे सरकार असून, हे सरकार आरएसएसच्या विचारांवर चालणारे आहे. हे सरकार सर्वसामान्य नागरिकांना राज्यघटनेने दिलेले हक्क व अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असून, घटनाबाह्य कामांना प्रोत्साहन देत आहे. तसेच सरकार राज्यघटना नाकारण्याचा प्रयत्न करीत असून, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून हुकमशाहीच्या दिशेन वाटचाल करीत आहे. भाजपचे खासदार श्री.हेगडे यांनी 'आम्ही घटना बदलण्यासाठीच निवडून आलो आहोत', असे वक्तव्य अलिकडेच केले आहे. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण राज्यात संविधान व लोकशाही बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ.नामदेव उसेंडी यांनी दिली आहे.
काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.उसेंडी यांनी केले आहे.