गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१४: वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन १५, १६ व १७ फेब्रुवारी रोजी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे होणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
श्री.विनोद मोहतुरे यांनी सांगितले की, संत तुकाराम अध्यासन केंद्राचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच विविध खात्यांचे मंत्री, प्रसिद्ध संत साहित्यिक यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी सकाळी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते दिंडीचा शुभारंभ होणार आहे. सकाळी १० वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होईल. यावेळी संत तुकाराम अध्यासन केंद्राचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर हे गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून संमेलनाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारतील. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप व सत्कार सोहळा होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजयबापू शिवतारे, आदिवासी विकास व वनराज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, उपस्थित राहणार आहेत.
वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र पुरस्कृत 'वारकरी विठ्ठल पुरस्कार' राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येईल.अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ, मोझरीचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे हे पुरस्कार स्वीकारणार आहेत.
वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्कार' संत गाडगे महाराज मिशन नागरवाडी जि. अमरावती यांना जाहीर झाला असून, हा पुरस्कार बापुसाहेब देशमुख स्वीकारणार आहेत. तसेच पहिला संत चोखामेळा पुरस्कार सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री.मोहतुरे यांनी दिली. संत साहित्यप्रेमींनी या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री.मोहतुरे यांनी केले.