गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२२: राज्य शासनाच्या विविध विभागात रिक्त असलेली १ लाख ७० हजार पदे तत्काळ भरावीत या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज सुशिक्षित बेरोजगार व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
राज्य शासनाच्या विविध विभागात १ लाख ७० हजार पदे रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरावीत, एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा रद्द करुन पीएसआय, एसटीआय, एएसओ इत्यादी पदांच्या पूर्वीप्रमाणेच व स्वतंत्र परीक्षा घेऊन जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढावी, जिल्हा निवड भरतीवरील बंदी त्वरित उठवावी, गडचिरोली जिल्हा पोलिस भरतीच्या जागा वाढविण्यात याव्यात, एमपीएससीने तामिळनाडू पॅटर्न लागू करावा, राज्यसेवेच्या ६९ पदांमध्ये वाढ करावी, शिक्षक भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी अशा १४ मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चात शेकडो सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती सहभागी झाले होते. यावेळी ट्रॅक्टरवर सुशिक्षित युवक रोजगाराअभावी फाशी लागत असल्याचा देखावा निर्माण करण्यात आला. हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. काहींनी सुशिक्षितांवर पकोडे आणि चहा विकण्याची पाळी असल्याचे प्रत्यक्ष कृती करुन प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.
मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
जयंत पेद्दीवार, पंकज मल्लेलवार, प्रणय घुटके, अमित क्षीरसागर, गजानन गोरे अमित तलांडे, दामदेव शेरकी, नीतेश राठोड, भैयाजी झोडापे, संतोष बोलुवार, शैलेश खरवडे, प्रितेश अंबादे, देवा मेश्राम, दिवाकर शेंडे, अभिजित मोहुर्ले, मिलिंद साळवे, निखिल ठाकूर, दर्शन कोसरे, सचिन मलोडे, अंकित पित्तुलवार, अमोल खोब्रागडे, कुणाल कुकडे, विवेक कुनघाडकर, शीतल गेडाम, रेशमा गोन्नाडे, रोहिणी नैताम आदींनी मोर्चाच्या आयोजनासाठी सहकार्य केले.