गडचिरोली | --°C | --°C |
कुरखेडा, ता.२७: भाषा संपली की, संस्कृती नष्ट होते. संस्कृतीच्या रक्षणाकरिता मायबोलीचे अस्तित्व अबाधित राहणे गरजेचे आहे. म्हणून दैनंदिन व्यवहारात आपल्या भाषेचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचे प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी केले.
राज्य परिवहन विभागातर्फे येथील बसस्थानक परिसरात कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मराठी भाषा दिन व वाचन सप्ताह कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. नगराध्यक्ष डॉ.महेंद्र मोहबंसी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सिराज पठाण, बसस्थानकप्रमुख राजेश राठोड, भुमेश्वर लिल्हारे, प्रा.विनोद नागपूरकर, पुरुषोत्तम जनबंधू उपस्थित होते.
प्रा.डॉ.आरेकर पुढे म्हणाले, तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणात केवळ इंग्रजी भाषेचीच मक्तेदारी असल्याने इतर भाषा व मायबोली मराठीच्या महत्त्वावर मर्यादा आली. खरे तर मराठी भाषा ही समृद्ध असून, भाषेतूनच संस्कृती प्रवाहित होत असते. त्यामुळे आपल्या भाषेचा गौरव, अभिमान व प्रेम बाळगत दैनंदिन जीवनात या भाषेचा वापर करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष डॉ.मोहबंसी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात मराठी भाषेतून करुन मराठीतच संवाद साधण्याचे आवाहन केले. चांगदेव फाये यांनी मराठी भाषेचे जतन ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन नोमेश गेडाम यांनी केले. भिमराव सोरते यांनी आभार मानले. याप्रसंगी शिवाजी हायस्कूल व अन्य शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.