गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१२: यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत गोंधळ घालून ती बंद पाडणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या विरोधात आज खा.अशोक नेते यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी गडचिरोलीत उपोषण केले.
आज सकाळपासून इंदिरा गांधी चौकात खा.अशोक नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, रमेश भुरसे, डॉ.भारत खटी, रवींद्र ओल्लालवार, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालु दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, जिल्हा सचिव विलास गावंडे, कुरखेडा तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य रंजिता कोडापे, शिल्पा रॉय, आरमोरी तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संगीता राऊत, नगरसेविका रंजना गेडाम, नीता उंदिरवाडे, वर्षा बट्टे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, नगरसेवक संजय मेश्राम, गजानन यनगंधलवार, डी.के.मेश्राम, प्रकाश अर्जुनवार, जावेद अली, डेव्हीड बोगी, युवराज बोरकुटे यांच्यासह जिल्हयातून आलेले पदाधिकारी उपोषणाला बसले.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस खासदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. संसदेत लोकांच्या हिताचे महत्वाचे निर्णय घेतले जातात. परंतु काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घालून संसद महिनाभर बंद पाडली. संसद बंद राहिल्याने लोकहिताचे निर्णय होऊ शकले नाहीत. काँग्रेस खासदारांच्या काही मागण्या होत्या तर त्यांनी चर्चा करायला हवी होती. सरकारही चर्चेस तयार होते. परंतु काँग्रेसने संसदेचे कामकाज होऊ दिले नाही. हे लोकशाहीविरोधी असून, अशा मंडळींना आगामी निवडणुकीत जनता माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर व नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी या उपोषण मंडपाला भेट दिली.