मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान कंत्राटी एनआरएचएम कर्मचाऱ्यांचा 'वॉक आऊट',

Sunday, 15th April 2018 06:13:51 AM

गडचिरोली, ता.१५: कार्यक्रमादरम्यान आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची परवानगी संबंधितांनी नाकारल्याच्या निषेधार्थ आज एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना वॉक आऊट केल्याने गोंधळ उडाला. 

गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालय तसेच जिल्हा नियोजन विभागाच्या इमारतीचे उद्घाटन श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत, पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालु दंडवते, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त श्री.अनुपकुमार, पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल उपस्थित होते.

आरोग्य विभागाचा कार्यक्रम असल्याने एनआरएचएममध्ये कार्यरत शेकडो कंत्राटी कर्मचारी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्यासाठी आले होते. परंतु सुरक्षारक्षकांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे सर्वजण मंडपात बसून भाषण ऐकत होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना मंडपात उपस्थित कर्मचारी अचानक उठून बाहेर पडू लागले. यामुळे काही क्षण गोंधळ निर्माण झाला. कार्यक्रमानंतर सर्वांनी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या गाडीला घेराव करुन त्यांना निवेदन दिले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात सुमारे १८ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी व अधिकारी मागील १० वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी शासकीय सेवेत घेण्यात यावे, या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शिवाय मंत्री, खासदार व आमदारांना घेरावही घातला. मात्र, शासनाने या कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्याने त्यांनी ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. अशातच आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची संधी न मिळाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी मंडपातून वॉक आऊट केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HJIGT
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना