गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

पुन्हा चकमकीत २१ नक्षलवादी ठार, मृतांचा एकूण आकडा ३७ वर पोहचला

Monday, 23rd April 2018 11:55:25 PM

 

गडचिरोली, ता.२४: २२ एप्रिलच्या सकाळी बोरिया जंगलात १६ नक्षल्यांचा खात्मा केल्यानंतर पोलिसांना घटनास्थळानजीकच्या नदीत नक्षल्यांचे आणखी १५ मृतदेह सापडले असून, राजाराम खांदला-नैनेर परिसरातील चकमकीत पुन्हा ६ नक्षल्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशाप्रकारे मृत नक्षल्यांचा आकडा ३७ वर पोहचला असून, ६ नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आले आहेत. 

शनिवारी(ता.२१)रात्री सी-६० पथक व सीआरपीएफच्या क्रमांक ९ बटालियनचे पोलिसांनी ताडगावनजीकच्या बोरिया जंगलात नक्षल्यांना घेरले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे झालेल्या चकमकीत १६ नक्षली ठार झाले. त्यात डीव्हीसी सिनू, त्याची पत्नी कमांडर शांता व पेरमिली दलम कमांडर तथा डीव्हीसी साईनाथ यांचा समावेश होता. काल(ता.२३)घटनास्थळ परिसरात पोलिसांनी पाहणी केली असता इंद्रावती नदीच्या पात्रात आणखी १५ नक्षल्यांचे मृतदेह सापडल्याची माहिती आहे. तसेच कालच राजाराम खांदला-नैनेर परिसरात संध्याकाळी झालेल्या चकमकीत पुन्हा ६ नक्षली ठार झाले. यात दोन पुरुष व ४ महिला नक्षलींचा समावेश आहे. या चकमकीत डीव्हीसी वासुदेव आत्राम उर्फ नंदू, क्रांती(प्लाटून क्रमांक ७ ची सदस्य), कार्तिक उईके रा.कटेझरी(प्लाटून क्रमांक ७ चा सदस्य), जयशिला गावडे रा.बिनागुंडा(अहेरी एलओएस सदस्य) व लता वड्डे(अहेरी एलओएस सदस्य) हे ठार झाले आहे. एका महिला नक्षलीची ओळख अद्याप पटायची आहे.

ही कारवाई अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक ए.राजा व डॉ.हरी बालाजी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या ६ नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आले असून, इंद्रावती नदीच्या पात्रात आढळलेल्या १५ नक्षल्यांचे मृतदेह आणण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे पोलिसांचे मनोबल उंचावले असून, आजपर्यंतच्या इतिहासात नक्षल्यांना सर्वांत मोठा धक्का बसला आहे. पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी नक्षल चळवळीच्या इतिहासात मिळविलेले हे अभूतपूर्व यश आहे. दरम्यान, रविवारच्या चकमकीत ठार झालेल्या डीव्हीसी सिनूचे नातेवाईक आज सकाळी गडचिरोलीला पोहचले. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सिनूचा मृतदेह ताब्यात घेतला. 

बारावी सायंसमध्ये प्रथम आला होता डीव्हीसी नंदू

राजाराम खांदला-नैनेर परिसरात झालेल्या चकमकीत ठार झालेला डीव्हीसी नंदूचे मूळ नाव वासुदेव आत्राम असे असून, तो अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली येथील रहिवासी होता. त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळेत घेतले. २००१-०२ मध्ये बारावी विज्ञान शाखेत त्याने शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र, त्यानंतर तो नक्षल चळवळीकडे आकृष्ट झाला. काल त्याला प्राण गमवावा लागला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
38ISR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना