गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१:राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्र सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे. ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ वा वर्धापन दिन सोहळा आज येथे पोलिस कवायत मैदानावर झाला, याप्रसंगी ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख उपस्थित होते.
अम्ब्रिशराव आत्राम पुढे म्हणाले, विविध धर्म आणि पंथ असणाऱ्या लोकांचे असणारे आपले महाराष्ट्र राज्य अनेक भाषा व परंपरा जपत आहे. राज्यात स्थापनेपासून सामाजिक व आर्थिक न्याय देण्याचे काम सुरु आहे. याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. आज देशापुढे अनेक समस्या आहेत. त्यात प्रामुख्याने विघटनवादी शक्तांचा उल्लेख करावा लागेल. तसेच देशांतर्गत आपल्या राज्यासह इतर शेजारी राज्यांमध्येसुद्धा नक्षल चळवळीमुळे अशांतता निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्याची जबाबदारी शासनाची असून, ती समर्थपणे पेलली जात आहे. हे करीत असताना अनेक जवानांनी आपले बलिदान दिले आहे. त्या जवानांचे या दिवशी स्मरण करुन त्यांना अभिवादन करतो. या चळवळीचा बीमोड करण्यात पोलिस दलाच्या जवानांनी नुकतेच जे शौर्य दाखविले, त्या जवानांचे श्री.आत्राम यांनी अभिनंदन केले. अशा शक्तींचा बीमोड करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्याच्या सर्व भागातील जनतेची मने सांधण्याचे, त्यांच्यातील ऐक्यभावना वृद्धिंगत करण्याचे व महाराष्ट्र राज्य एकसंध बनविण्याचे कार्य राज्याचे पहिले मुख्यमंत्री व त्यांच्या नंतरच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी केले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांनुसार आणि त्यांनी अंगिकारलेल्या धोरणानुसार महाराष्ट्राच्या विकासाचा रथ प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. राज्यातील सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय चळवळीतही या राज्याने अग्रक्रमाचा मान मिळविला असून, एक पुरोगामी राज्य म्हणूनही महाराष्ट्राची देशभर ख्याती झाली आहे. हे राज्य शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा अंगिकार करणारे आहे, असेही पालकमंत्री आत्राम म्हणाले.
आज प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा सांभाळण्याबरोबरच राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता राखल्याचा निर्धार आपण करु या. भारतीय लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत केल्यास जगात भारताला अधिक महत्त्व प्राप्त होईल. यादृष्टीने आपण सतत प्रयत्न करीत राहू. या सर्व बाबींकरिता आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या नेतृत्वात पोलिस जवानांचे महिला व पुरुष पथक तसेच होमगार्डच्या पथकाने संचलन केले. बॉम्बशोधक व नाशक पथकानेही यात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी मदन टापरे यांनी केले. अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.