शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

लोकशाही बळकटीकरणासाठी... उज्ज्वल भवितव्यासाठी !

Monday, 13th October 2014 11:25:02 PM

विधानसभा निवडणूक 2014 : विशेष लेख


लोकशाही बळकटीकरणासाठी... उज्ज्वल भवितव्यासाठी !
              देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी पारदर्शक, निर्भय आणि नि:पक्षपणे आणि नैतिक मतदान ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. अशाच प्रकारे निवडणुका पार पडल्यानंतर बळकट लोकशाही निर्माण होऊन नागरिकांचे उज्ज्वल भवितव्य घडण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अठरा वर्षावरील सर्व मतदारांनी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सुटीच्या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत  मतदानाचा हक्क बजावायलाच हवा. हा दिवस केवळ मतदानाचा दिवस नसून तो आपला सण आहे. अगदी या प्रमाणे आनंदात आणि उत्साहात आपण तो साजरा करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूयात.  
               लोकशाहीला अधिक बळकट करण्याचे कार्य निवडणुकांच्या माध्यमातून मतदार राजा पार पाडत असतो. परंतु काही मतदार मात्र पैसा, दारूच्या आमिषाला बळी पडतात. जे मतदार पैसे घेतात. दारूपायी मत विकतात. हे सर्वच लोकशाहीला मारक आहे. मात्र, मतदारांनी निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी पुढे यावे. कोणत्याही लालसेपोटी मतदान करू नये. आपल्या बुद्धीला योग्य वाटेल अशाच उमेदवारांना मत द्यावे. ही राष्ट्रीय जबाबदारी आहे. ती पार पाडताना प्रत्येकाने देश हिताकरीता सर्वोत्तम अशा उमेदवाराची निवड करावी. आपल्या बुद्धीप्रमाणे मत देणे यालाच सद्सद् विवेकबुद्धी म्हणता येईल. म्हणूनच सद्सद् विवेक बुद्धीचा वापर करून मताचा अधिकार बजावावा.
                गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी मतदार संघातील मतदारांत जागृती निर्माण करण्यासाठी प्रशासनामार्फत मोठ्याप्रमाणत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जनतेनेही या उपक्रमात सहभागी होऊन सकारात्मकरित्या प्रतिसाद द्यावा.  निवडणूक विभागामार्फत 'इलेक्शन एक्सप्रेस' रथाच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे.
              कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही यामाध्यमातून करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रमुख भागांत फ्लेक्स, माहिती पुस्तिका, हस्तपुस्तिका, इव्हीएम मॉक पोलिंग, पथनाट्य,  लोककला, युवा संसद, कॅम्पस ॲम्बेसेडर, शाळकरी मुलांचे संकल्प पत्र, मतदार चिठ्ठी, विविध स्पर्धा आदी माध्यमातून मतदारांत आणि भावी मतदारांत मतदान करण्याबाबत जागृती करण्यात येत आहे. दुर्गोत्सवातील देखाव्यांच्या माध्यमातूनही मतदार जागृतीसाठी आवाहन करण्यात आले.
                  महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती दिनी प्रत्येक गावागावांत ग्रामसभा घेण्यात आल्या. या ग्रामसभांच्या ठिकाणी उपस्थ्िाीतांना मतदार चिठ्ठीचे वितरण करण्यात आले. तसेच ज्या मतदारांना मतदार चिठ्ठी मिळालेली नाही अशा मतदारांनाही प्रशासनामार्फत मतदार चिठ्ठीचे वाटप सुरू आहे. आरोग्य, शिक्षण, उच्च शिक्षण, उच्च तंत्र शिक्षण, पुरवठा, जिल्हा माहिती कार्यालय,                   गोंडवाना विद्यापीठ,  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महिला आणि बालविकास, कृषी, नगर परिषद, नेहरू युवा केंद्र आदी शासनाच्या महत्त्वपूर्ण विभागामार्फत स्वीप (Systematic voters Education Electoral Participation) टप्पा दोन यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.  मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी उत्त्तम प्रतिसाद दिला. त्याचप्रकारे आता नागरिक आपल्या मताचा अधिकारही त्यांच्या मनाजोगा योग्य उमेदवार निवडण्यासाठी करतील. त्यासाठी ते इतरांनाही सांगतील. भावी मतदारांनाही जागृत करतील, आपली जबाबदारी आहे,  हा या टप्पा दोनचा उद्देश आहे. त्यादृष्टीने स्वीपच्या कोअर कमिटीही काम करते आहे.
                  देशात पुरूषांबरोबरच महिलाही खांद्याला खांदा लावून काम करताहेत. स्पर्धा, शिक्षण, नोकरी आदी क्षेत्रात त्या कुठेही तसूभर कमी नाहीत. मग त्यांनीही त्यांच्या मताचा हक्क बजावण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. तरच आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात समसमान मतांची टक्केवारी  पाहायला मिळेल. भारतीय संविधानाने अठरा वर्षावरील प्रत्येकाला मतदानाचा हक्क बहाल केलेला आहे. आपल्या भागातील प्रश्न लोकप्रतिनिधींमार्फत मांडण्यासाठी  लोकप्रतिनिधींची  निवड करण्याचा अधिकार दिला. या अधिकाराचा सर्व मतदारांनी वापर करून एथिकल व्होटिंगचा म्हणजेच नैतिक मतदानाचा हक्क बजावावा. अशा पद्धतीने आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक मतदार हक्क बजावेल, अशी आशा आहे.
                मताचा हक्क विचार आणि मुल्य असून तो अनमोल आहे. त्यामुळे पाच वर्षात एकदाच मिळणारा हा हक्क बजावताना प्रत्येकाने सकारात्मक विचाराने पुढे येऊन मतदारांत जागृती करावी. लोकशाहीच्या पर्वात निवडणूकही हा एकप्रकारचा सण आहे. आपण ज्याप्रमाणे दसरा, दिवाळी, ईद आदी सण मोठ्या उत्साहात साजरी करतो. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक मतदाराने निवडणुकीचा दिवस हा सणाप्रमाणे साजरा करायला हवा.
                    आपण कुठेही असो, मात्र सणानिमित्त कुटुंबामध्ये एकत्र येतो.  आनंदाने एकत्रितपणे सण साजरा करतो. अगदी त्याचप्रमाणे निवडणुकीतील मतदानाचा दिवस साजरा करावा. लोकशाहीतील हा महत्त्वाचा असा सणच आहे. त्यामुळे इतर सणांसह या सणाच्याही आपणा सर्वांना शुभेच्छा. हा सण उत्साहात, आनंदात साजरा करून एथिकल व्होटिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. मतदानाच्या दिवशी म्हणजेच 15 ऑक्टोबरला सुटी असल्याने प्रत्येकाने हा दिवस देशाच्या हितासाठी मार्गी लावावा.  तरच आपल्या देशाची लोकशाही अधिक बळकट होऊन नागरिकांचे भवितव्य उज्ज्वल होण्यास मदत होईल.

-    रणजीत कुमार
जिल्हाधिकारी, गडचिरोली
(शब्दांकन: श्याम टरके)


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4AUVG
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना