गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१३: चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार इंद्रकुमार सराफ हे अचानक अंग काढून टाकल्यासारखे वागू लागल्याने भाजपचे उमेदवार डॉ.रामदास आंबटकर यांच्या एकतर्फी विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाला, अशी चर्चा सुरु झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदारसंघातून काँग्रेसने प्रचंड गोपनीयता बाळगत वर्धेचे इंद्रकुमार सराफ यांना उमेदवारी दिली. श्री.सराफ हे तगडे उमेदवार आहेत, असाही प्रचार करण्यात आला. मात्र, अर्ज सादर केल्यानंतर सराफ हे निवडणूक लढण्यास फार उत्सुक दिसले नाही. ही निवडणूक पैशावर चालणारी असल्याची जाणीव असतानाही सराफ यांनी कुटुंबीयांकडून आर्थिक प्रतिसाद न मिळाल्याने ऐनवेळी अंग काढून घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यातच शुक्रवारी श्री.सराफ यांनी नागपुरात भाजपच्या एका हेवीवेट नेत्याची भेट घेऊन भाजपपुढे नांगी टाकल्याचे वृत्त आज एका वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर खळबळ माजली. सराफ यांना निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते, प्रदेश उपाध्यक्ष व ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर पक्षाने सोपवली होती. परंतु निवडणूक ऐन जोमात असताना श्री.सराफ यांनी अंग काढल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काल सराफ व त्यांच्या पुत्राने वडेट्टीवार यांची भेट घेऊन आपण पैसे खर्च करु शकत नाही, असे स्पष्ट सांगितल्याने वडेट्टीवारांसह त्यांच्या बंगल्यावर उपस्थित अनेकांनी तोंडात बोटे टाकली. ही वार्ता पसरताच काँग्रेसचे मतदार प्रचंड निरुत्साही झाले आहेत.
आता निवडणुकीला आठ दिवस शिल्लक असताना इंद्रकुमार सराफ हे पुन्हा जोमाने रणांगणात उतरण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे सराफांच्या विजयाची जबाबदारी असलेल्या वडेट्टीवारांनाही पक्षनेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एकंदरित परिस्थिती पाहता मतदार व राजकीय जाणकारांना या निवडणुकीबाबत अजिबात उत्सुकता राहिली नसून, भाजपचे उमेदवार डॉ.रामदास आंबटकर यांच्या एकतर्फी विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे मानले जात आहे.