गडचिरोली | --°C | --°C |
वर्धा, ता.१४: आपण भाजपच्या बड्या नेत्याची भेट घेऊन निवडणूक रिंगणातून माघार घेणार असल्याचे वृत्त म्हणजे विरोधी पक्षाने केलेला खोटा प्रचार आहे. मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असून, विरोधी पक्षाच्या दबावाला बळी पडून आपली उमेदवारी मागे घेणार नाही, असे काँग्रेसचे उमेदवार इंद्रकुमार सराफ यांनी काल(ता.१३)पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला कॉग्रेसचे वर्धा नगर परिषदेतील गटनेते नीलेश खोंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना ढगे, राकॉचे नगर परिषदेतील गटनेते सोनल ठाकरे, नगरसेवक मुन्ना णाडे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष सुरेश ठाकरे उपस्थित होते.
इंद्रकुमार सराफ म्हणाले की, मी वर्धा शहराचा १५ वर्षे नगरसेवक व नगराध्यक्षही राहिलो आहे. मी सुरुवातीपासूनच काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी वर्धा येथे आले असता त्यांचे स्वागत करण्याचा मान मला मिळाला होता. या निवडणुकीत काँग्रेस व राकाँचे मतदार मला सहकार्य करीत आहेत. भाजप व शिवसेनेची युती तुटली असून, शिवसेना व भाजपचे नाराज मतदार आपल्यासोबत आहेत. परंतु मी विरोधी पक्षनेत्याची भेट घेतली व उमेदवारी मागे घेणार आहे, अशा वावड्या उठविल्या जात आहेत. त्या सपशेल खोट्या आहेत, लोकशाहीला धोका पेाहचेल, असे कोणतेही कृत्य मी करणार नाही, असे सराफ यानी स्पष्ट केले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आ.विजय वडेट्टीवार यांना फोन आला होता. त्यावेळी आपण स्पीकर ऑन करुन दोघांचे संभाषण ऐकले. तेव्हा कशाला निवडणूक लढविता. तुम्ही खर्चात पडता आणि आम्हालाही खर्चात पाडता, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाल्याचा गौप्यस्फोट इंद्रकुमार सराफ यांनी पत्रकार परिषदेत केला.
श्री.सराफ यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टोक्ती दिल्यानंतर आता ते किती जोमाने प्रचाराला भिडतात, यावर पुढचे गणित अवलंबून आहे. सराफ यांनी पुन्हा नव्या जोमाने प्रचार केला तर भाजपला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असे जाणकारांचे मत आहे.