गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१९: जल, जंगल व जमिनीवर स्थानिकांचा अधिकार असून वनविभागाने वृक्षतोड करु नये, असे फर्मान सोडत आज मध्यरात्री सशस्त्र नक्षल्यांनी अहेरी तालुक्यातील तलवाडा येथील लाकूड आगारातील लाकडांना आग लावली.
तलवाडा येथील लाकूड डेपो अगदी रस्त्यावर आहे. मध्यरात्री सशस्त्र नक्षल्यांनी आगारात ठेवलेल्या लाकडांना आग लावली. या आगीत सुमारे १९.५० सागवान बिट जळाले. घटनेची माहिती मिळताच आलापल्ली येथून पाण्याचे दोन टँकर नेऊन आग आटोक्यात आणण्यात आली. ही लाकडे दोन महिन्यांपूर्वीच तोडलेली असल्याने ती ओलसर होती. त्यामुळे लाकडे पूर्णपणे जळाली नाही. मात्र, या जाळपोळीत वनविभागाचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर नक्षल्यांनी घटनास्थळी बॅनर बांधून पत्रकेही टाकली.
तलवाडा येथील लाकूड डेपोला नक्षल्यांनी आग लावण्याची मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १२ मार्चला नक्षल्यांनी येथील लाकडे मोठ्या प्रमाणावर जाळली होती. पोलिस आणि वन विभागाच्या कामांवर बहिष्कार घाला, लाकूड बिट, बांबू काढणे बंद करा, वनकर्मचाऱ्यांनी जंगलात प्रवेश करु नये,जल, जंगल व जमिनीवर आदिवासीचा अधिकार असून, ग्रामसभांच्या परवानगीशिवाय नैसर्गिक संपत्तीला हात लावू नका, अशा आशयाचा मजकूर बॅनर व पत्रकांवर आहे. भाकपा माओवादी पेरमिली एरिया कमिटीने हे पत्रक काढले आहे. जाळपोळीनंतर नक्षल्यांनी तलवाडापासून २ किलोमीटर अंतरावर झाडे तोडून रस्ता अडविला. त्यामुळे बराचवेळपर्यंत वाहतूक ठप्प होती.