/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
आष्टी,ता.११: बेरोजगारांना रोजगार देणारा सुरजागड लोह प्रकल्प जिल्ह्यातच व्हावा, अशी सर्वांची इच्छा होती. यासाठी अनेकांनी विविध पद्धतीने आंदोलने केल्यानंतर चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे प्रकल्प उभारण्यात येत आहे. यात कोनसरी येथील नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आपली जमीन उपलब्ध करून दिल्यामुळेच हा प्रकल्प येथे होऊ शकणार आहे. हा प्रकल्प म्हणजे सर्वांच्या सहकार्यामुळे उभा राहिलेला प्रकल्प आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे आ.डॉ. देवराव होळी, जनहितवादी संघटनेचे नेते सुरेश बारसागडे व दीक्षा झाडे यांचा स्थानिक नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी आ.डॉ.होळी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, माजी जि.प. सदस्य धर्मप्रकाश कुकूडकर, भाजपा तालुका अध्यक्ष श्री.भांडेकर, मनमोहन बंडावार आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. होळी पुढे म्हणाले, जनहितवादी संघटनेचे नेते सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात सुरजागड लोहप्रकल्प जिल्ह्यातच व्हावा, यासाठी जनआंदोलन उभे करण्यात आले होते. त्यांनी सुरजागड ते गडचिरोली जिल्हा मुख्यालयापर्यंत पदयात्रा काढली होती. त्यानंतर नुकतेच ९१ दिवसांचे उपोषणही केले. त्यांच्या मागण्या मान्य करीत कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातच लोह प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानुसार जमीन अधिग्रहणाची कार्यवाही अंतिम टप्यात आली असून लवकरच या प्रकल्पाची पायाभरणी होणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या लोहप्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यात एटापल्ली परिसरासह कोनसरी येथील युवकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने युवकांनी किमान कौशल्यप्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही आवाहन डॉ. होळी यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील नागरिकांनी सहकार्य केले.