गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,२०: स्थानिक नागरिकांनाच माहिती आहे की, या जिल्ह्याच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत आणि त्यांच्या निवारणाचे उपाय काय आहेत, हे येथील नागरिकांनाच ठाऊक आहे. यासाठीच त्यांच्या कल्पनांवर विचार करुन अंमलबजावणी करण्यासाठी 'मावा गडचिरोली' या चार दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. नागरिकांनी या चर्चासत्रात भाग घेऊन आपले विचार मांडावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पिपरे, आमदार डॉ. देवराव होळी, विभागीय आयुक्त अनुपकूमार, केंद्र शासनाने नियुक्त केलेले प्रभारी अधिकारी निरंजनकुमार सुधांशू, नीती आयेागाचे अधिकारी रामाकामा राजू, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पेालिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य वनसंरक्षक येटबॉन, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सचिन ओेंबासे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, नगरपरिषदेच्या अध्यक्ष योगिता पिपरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम पुढे म्हणाले की, २१ जूनपासून २३ जूनपर्यंत आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कौशल्य विकास आणि पायाभूत संरचना, कृषी व संलग्न सेवा, उपजिविकेचे साधन आणि आर्थिक समालोचन या विषयावर चर्चासत्र होत आहे. या चर्चासत्रात नागरिक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे व आपल्या कल्पना, विचार मांडावे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्हयामध्ये 'मावा गडचिरोली' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे याव्दारे सामान्य जनतेला त्यांच्या डोक्यात असणाऱ्या विविध कल्पना व विचारांना सर्वासमोर मांडण्यासाठी प्रशासनाने व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेले आहे. या उपक्रमाव्दारे जिल्हा प्रशासन तुमच्या पर्यंत चालून आलेले आहे. आता वेळ आलेली आहे ती तुम्ही एक पाऊल पुढे टाकण्याची. ज्या कल्पना, विचार जिल्हयातील अडचणी दूर करण्याचा अथवा जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने संयुक्तीक व समर्पक वाटतील त्यांची निवड करुन सदर विचारांची शासनाच्या इतर विचारांशी सांगड घालून आवश्यक ती कार्यवाही करण्याचा निश्चितच प्रयत्न केल्या जाईल.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, वन कायद्यामुळे विकास प्रक्रियेत बाधा निर्माण झाली आहे. परंतु याच वनावर आधारीत उद्योगाचा विकास करण्यास संधीसुध्दा आहे. येथील उपलब्ध पर्यटन स्थळांचा विकास करुन लघु उद्योग, रोजगार जिल्हयात उपलब्ध करता येईल. शासनाच्या संपूर्ण योजना हया तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा सामाजिक दायित्वाचे भान ठेवून यंत्रणानी सातत्याने कामे केल्यास निश्चितच विकासाची गंगा ओढून आणू यात शंका नाही. असेही निर्देशवजा आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी केंद्राचे प्रभारी अधिकारी निरंजन कुमार सुधांशु म्हणाले की, नागरिकांनी आपली महत्वाकांक्षा वाढविणे विकासाच्या दृष्टीने गरजेचे आहे. साधे, शांत राहून चालणार नाही. अंमलबजावणी यंत्रणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकात मिसळून काम करण्याची नितांत गरज आहे. मी कोळसा मंत्रालयात कार्यरत असलोतरी या जिल्हयाचा तत्कालीन जिल्हाधिकारी म्हणून माझी नाड जोडलेली आहे. जिल्हयाच्या विकासासाठी मी स्वत: केंद्रसरकारच्या सर्व विभागांशी संपर्क करुन समस्याचे निराकरण करील असे ते म्हणाले.
यावेळी आमदार डॉ. होळी, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पिपरे, निती आयोगाचे अधिकारी रामकामा राजू, विभागीय आयुक्त अनुपकूमार, सेवाभावी संस्थाचे हिराबाई हिरालाल, देवाजी तोफा यांनीसुध्दा उपस्थित कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी यांना संबोधित केले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचे स्वरुप सांगताना म्हणाले की, निती आयोगाच्या बैठकीत ११५ आकांक्षित जिल्हयाची निवड झाली यामध्ये गडचिरोली जिल्हयाचा समावेश आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थीत करुन गतीने विकास साधण्यासाठी सामाजिक संस्था, शासकीय यंत्रणा यांचा यामध्ये महत्वपूर्ण सहभाग राहणार आहे. दुर्गम समस्याग्रस्त जिल्हा असला तरी सकारात्मक विचार करुन जिल्हयाच्या विकासासाठी आपल्या डोक्यात असणाऱ्या कल्पनाना समोर येउु द्या. आज आपल्याला ही सुवर्ण संधी लाभली असल्याचे त्यांनी यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हयातील पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, सामाजिक संस्थेचे प्रमुख, सर्व योजना अंमलबजावणी करणारे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन व आभार जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी मानले.