गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता,२५: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद केले. नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईला पळविले. एकूणच हे सरकार विदर्भविरोधी असल्याने पदवीधर मतदार सरकारविरोधात कौल देतील, असा विश्वास भाजप नेते तथा माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ बावनकुळे आज गडचिरोलीत आले होते. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. ही निवडणूक भाजप विरुद्ध राज्य सरकार अशी आहे, असे बावनकुळे म्हणाले. विदर्भाचा अनुशेष प्रचंड आहे. परंतु विदर्भ वैधानिक मंडळ बंद केल्याने हा अनुशेष कोण काढेल, असा सवालही त्यांनी केला. १९५० च्या करारानुसार विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेणे बंधनकारक आहे. परंतु सरकारने या कराराचा भंग केला आहे. नागपुरात अधिवेशन घेतल्याने कोरोना होतो, तर मुंबईत कोरोना नाही काय? असा प्रश्न उपस्थित करुन श्री.बावनकुळे यांनी राज्य सरकारने पूरग्रस्तांना एक दमडीही दिली नाही. असा आरोप केला.
भाजप सरकारने गडचिरोली जिल्ह्यासाठी २५० कोटी व गडचिरोली नगरपरिषदेला ३२ कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम दिलीच नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास थांबला आहे. या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदार भाजपच्या संदीप जोशी यांना बहुमतांनी निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भरमसाठ वीज बिलासंदर्भात सध्याच्या सरकारच्या धोरणावरही टीका केली. याप्रसंगी खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, रवींद्र ओल्लालवार, नगरसेवक प्रमोद पिपरे उपस्थित होते.