गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२६: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या, तसेच कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आज शेतकरी कामगार पक्षाने गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी बैलगाडी मोर्चा काढला.
शेकापचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, महिला नेत्या जयश्री वेळदा, खजिनदार शामसुंदर उराडे, सहचिटणीस संजय दुधबळे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर आदींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. दुपारी वाजता मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिल्यानंतर तेथे शेकाप नेते रामदास जराते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकार शेतकरी व कामगारांच्या विरोधात धोरण आखत असून, त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे, असे रामदास जराते यावेळी म्हणाले. आजच्या मोर्चात भाई अशोक किरंगे, चंद्रकांत भोयर, दामोधर रोहनकर, प्रदीप आभारे, गंगाधर बोमनवार, महागूजी पिपरे, तुकाराम गेडाम, सुनील कारेते, विजया मेश्राम, मंदाताई आवारी,किसन साखरे, मनोहर ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.