गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.७: एका शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीशेजारी असलेल्या अतिक्रमीत जमिनीची नोंद नावावर करण्यासाठी त्याच्याकडून १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चातगाव येथील मंडळ अधिकारी प्रमोद फकिरा वारजूरकर(५७) व रांगी येथील तलाठी पुरुषोत्तम त्र्यंबक तुलावी(४६) यांना रंगेहाथ पकडले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा शेतकरी असून, त्याची सर्वे क्रमांक ६२ मध्ये स्वत:ची जमीन आहे. या जमिनीशेजारी असलेल्या अतिक्रमीत जमिनीची नोंद तक्रारकर्त्याच्या नावावर करायची होती. परंतु त्यासाठी मंडळ अधिकारी प्रमोद वारजूरकर व तलाठी पुरुषोत्तम तुलावी यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ते १३ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले. मात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्या शेतकऱ्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी रांगी येथे तलाठी कार्यालय परिसरात सापळा रचून तलाठी पुरुषोत्तम तुलावी यास १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. मंडळ अधिकारी प्रमोद वारजूरकर व तलाठी पुरुषोत्तम तुलावी यांच्या विरोधात धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय दोघांच्याही निवासस्थानांची झडती घेण्यात येत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार नथ्थू धोटे, सतीश कत्तीवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकार, किशोर ठाकूर, तुळशीराम नवघरे आदींनी ही कारवाई केली..