गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.८: कृषी विधेयक मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज शेतकऱ्यांच्या संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
आज गडचिरोली येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून भारत बंद आंदोलन यशस्वी केले. गडचिरोली शहरातील सर्व दुकाने सकाळपासूनच बंद होती. गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात सभा घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, विलास कोडापे आदींच्या नेतृत्वात शिवसैनिकांची रैली मोदी सरकारविरोधात घोषणा देत सभास्थळी आली.
या सभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख किशोर पोतदार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश ताकसांडे, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री वेळदा, रिपब्लिकन पक्षाचे नेते रोहिदास राऊत, पीरिपा नेते मुनिश्वर बोरकर, भाकप नेते देवराव चवळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवाद, विलास कोडापे आदींनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
या आंदोलनात काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष् सतीश विधाते, नंदू वाईलकर, रजनिकांत मोटघरे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर उराडे, अक्षय कोसनकर, निर्मला मेश्राम यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा इत्यादी तालुक्यांमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अहेरी येथे आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आरमोरी येथे काँग्रेस नेत्यांसह भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, माकप नेते अमोल मारकवार आदींनी, कुरखेडा येथे काँग्रेस नेते जयंत हरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल आदींनी बंद यशस्वी केला.