गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२८: तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आरंभिलेल्या ‘परिवार संवाद’ कार्यक्रमाचा शुभारंभ आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अहेरी येथून केला.
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी गडचिरोली येथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याबरोबरच जनतेच्या समस्या जाणून घेणे आणि सरकारच्या माध्यमातून त्या सोडविणे, हा परिवार संवाद अभियानाचा हेतू असल्याचे जयंत पाटील म्हणाले.बूथ हीच सत्तेची गुरुकिल्ली आहे. आपल्या पक्षाच्या बूथ समित्या ताकदवान असतील तर आपल्याला सहज विजय मिळवता येतो. त्यामुळे आपले बूथ सक्षम करावेत, असे आवाहन जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले. स्व. आर. आर. पाटील हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना इथल्या लोकांना जास्त वेळ देत होते. आबांना जाऊन अनेक वर्षे झाली, तरी आजही इथले लोक त्यांची आठवण काढतात, ही त्यांच्या कार्याची पावती आहे, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘परिवार संवाद’ अभियानाची सुरुवात विदर्भाच्या शेवटच्या टोकापासून केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार मानले. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवे चैतन्य निर्माण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश सावकार पोरेड्डीवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.