गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१: शेतकऱ्यांकडून अल्प किमतीत जनावरे खरेदी करुन ती कत्तलीसाठी नेणाऱ्या ११ जणांना गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी १ कोटी १५ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शाहबाज हमीद खान रा. हैद्राबाद, अब्दूल अजीज अब्दूलरहू, रा.गडचांदूर, जि.चंद्रपूर, करीम खाँ नबी खॉ रा.कलगाव, जि.यवतमाळ, आसिफ मोहसीन कुरेशी रा.नागपूर, मिर्झा मुजाहिद मुबारक बेग, रा.जेन्नूर(तेलंगणा) हल्ली मुक्काम राजुरा, जि.चंद्रपूर, मिर्झा गफ्फार अन्वर बेग, रा. उतनूर तेलंगणा, शेख अस्लम शेख नवाज रा.किरामिरी तेलंगणा, लतिफ खान बाबू खान, रा.इलियासनगर तेलंगणा, राजू मदन पाल, रा.यशोधरानगर नागपूर, राजेश मडकाम, रा.नेवसा,जि.मंडला, मध्यप्रदेश व कमलेश उर्फ पिट्टू नत्थुलाल गुप्ता, रा.नागपूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आज पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरमोरी तालुक्यातील वैरागड-ठाणेगाव मार्गावर ही कारवाई केली. आरोपींकडून १७ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या १४१ गाई, म्हशी आणि रेडे, ९७ लाख रुपये किमतीची तीन वाहने आणि १ लाख १३ हजार रुपयांचे १० मोबाईल असा एकूण १ कोटी १५ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली.