गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२३:मुसळधार पावसामुळे गोविंदपूर नाल्याच्या रपट्यावरुन पाणी वाहत असल्याने काल रात्रीपासून गडचिरोली-चामोर्शी हा मार्ग बंद झाला आहे. आता गडचिरोली-पोटेगाव-कुनघाडा-चामोर्शी हा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.
गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर नाल्यावर नवीन पुलाचे काम सुरु आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून कच्चा रपटा तयार करण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे हा रपटा वाहून गेल्याने मार्ग बंद झाला आहे. हा मार्ग बंद होण्याची पंधरा दिवसांतील ही दुसरी वेळ आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी १९ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून, २२२५ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दुपारी ३ वाजतापर्यंत हा विसर्ग ५ हजार क्यूमेक्सपर्यंत वाढविण्यात येणार असल्याने वैनगंगा नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गोदावरी, इंद्रावती व पर्लकोटा नद्याही फुगल्या आहेत. सध्या भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलाच्या दोन मीटर खालून पाणी वाहत आहे.
तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा बॅरेज ८५ पैकी ७० दरवाजे उघडण्यात आले असून, २७ हजार ३२६ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. शिवाय तेथील अन्य प्रकल्पांचे पाणी सोडण्यात येत असल्याने गोदावरी नदी फुगली आहे. सिरोंचा तालुक्यातील नगरम गावानजीकच्या प्राणहिता नदीच्या पुराचे पाणी काठाला टेकले आहे. यामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.