गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१३: वर्षभरात गडचिरोली तालुक्यात नरभक्षक वाघाने १४ निरपराध लोकांचा बळी घेतला आहे. यास जबाबदार असणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत आज आमदार डॉ. देवराव होळी आणि भयग्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन सरकारविरोधात निदर्शने केली.
वनविभागाने गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात अनेक वाघ आणून सोडले. परंतु त्यांच्यासाठी खाद्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे वाघ अन्नाच्या शोधात शेत शिवारात येऊन निष्पाप शेतकरी व शेतमजुरांना ठार करीत आहेत. आतापर्यंत एकट्या गडचिरोली तालुक्यात नरभक्षक वाघाने १४ निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार आणि आंदोलने करुनही वाघाचा बंदोबस्त करण्यात आला नाही. निष्पाप लोकांच्या मृत्यूला केवळ वनाधिकारी जबाबदार असून, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृतकांच्या परिवारातील एका सदस्यास शासकीय नोकरी देऊन किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी डॉ.देवराव होळी आणि नागरिकांनी केली.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे,भाजपा तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, महामंत्री हेमंत बोरकुटे, कळमटोला येथील संभाजी ठाकरे, धुंडेशिवणीच्या सरपंच भावना फुलझेले, आंबेशिवणी येथील उपसरपंच योगाजी कुडवे, राजगाटा चकचे पोलिस पाटील खिमदेवी चुधरी, गोगावचे सरपंच राजेंद्र उंदिरवाडे, दिभनाचे सरपंच रमेश गुरनुले, जेप्राच्या सरपंच शशिकला झंजाळ, भिकारमौशीच्या सरपंच लता मडावी, धुंडेशिवणीचे पोलिस पाटील भीमराव निकुरे , मारकबोडीचे माजी उपसरपंच रुपेश चुधरी, मुरमाडी येथील सचिन भुसारी, अतुल राऊत यांच्यासह परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.