गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२५: एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांसाठी १७.१७ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ आँक्टोबर २०२१ च्या मध्यरात्री पासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.
भाडेवाढीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. आज मुंबई येथे आयोजित संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकिट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे अशा प्रवाशांकडून वाहक सुधारीत तिकिटाच्या रकमेची आकारणी करतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी आणि अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून, दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किलोमीटरनंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयाच्या पटीत असणार आहे. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या गोरगरीब नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.