गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१८: नक्षलवाद हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर तो सामाजिक-आर्थिक विषयाशी निगडित प्रश्न आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले.
शरद पवार हे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. देसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित केल्यानंतर त्यांनी आज गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेतली. श्री.पवार म्हणाले की, आपण मुख्यमंत्री असताना नक्षलवादाचा अभ्यास करुन त्याच्या निर्मुलनासाठी धोरण आखले होते. मागास भागाचा विकास झाला नव्हता म्हणून नक्षलवाद फोफावला. त्याअनुषंगाने आपण त्यावेळी बीआरओमार्फत रस्ते व पुलांची निर्मिती केली. म्हणूनच आज आम्ही कुठेही जाऊ शकतो, असे पोलिसांनीच सांगितल्याचे श्री.पवार म्हणाले.
अलीकडे गडचिरोली जिल्ह्याच्या मागासलेपणात सुधारणा झाल्याचे दिसत आहे. मात्र, दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे सांगून श्री.पवार यांनी शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला जात असून, त्यासंदर्भात योग्य काळजी घेण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. रोजगाराअभावी नैराश्य आलेल्या युवकांना रोजगार देण्यासाठी उद्योग उभारले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पवार यांनी देशातील शेतकरी आंदोलन, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, त्रिपुरातील घटनेनंतर महाराष्ट्रात झालेला हिंसाचार यावरही भाष्य केलं. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सुबोध मोहिते, आ.धर्मरावबाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम उपस्थित होते.