गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२१: धानोरा तालुक्यातील माळंदा येथे १५ हेक्टर शेतीचे सिंचन करण्याची क्षमता असणारा साठवण बंधारा बांधण्यात येत आहे. या बंधाऱ्याचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्या हस्ते करण्यात आले.
मनोहर पोरेटी यांच्या निधीतून दुर्गम व् आदिवासीबहुल भागात अनेक लहान साठवण बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. माळंदा येथेही असाच बंधारा बांधण्यात येणारा आहे. उपविभागीय जलसंधारण कार्यालयामार्फत चव्हेला ग्रामपंचायत या बंधाऱ्याचे बांधकाम करणार आहे. १३ लाख रुपये किमतीच्या या बंधाऱ्यामुळे १२ ते १५ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. बंधारा पूर्ण झाल्यावर सिंचनाची समस्या मिटेल आणि शेतकऱ्यांना दुबार पीकदेखील घेता येईल, असा विश्वास जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी जांगदा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. पोरेटी, माजी पंचायत समिती सदस्य परसराम पदा, उपविभागीय जलसंधारण अधिकारी जयस्वाल, जलसंधारण अधिकारी श्री.खोब्रागडे, गजबे, स्थापत्य अभियांत्रिकी विनोद दशमुखे उपस्थित होते.