गडचिरोली | --°C | --°C |
मुंबई,ता.२६: सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑक्टो २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार, कोविड-१९ विषाणूमुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांस आपत्ती प्रतिसाद निधीमधून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अर्थसाह्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे दिली.
श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले की, ५० हजार रुपये थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील एखाद्या व्यक्तीचे कोविड १९ या आजारामुळे निधन झाले किंवा एखाद्या व्यक्तीने कोविड १९ च्या आजाराचे निदान झाल्याने घाबरुन आत्महत्या केली असेल अशा व्यक्तींच्या मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास ५० हजार रुपये इतके सानुग्रह साह्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासन पुढील आठवड्यात वेब पोर्टल तयार करणार असून, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाने या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. संपूर्ण पडताळणी केल्यानंतरच लाभार्थीला मदत मिळेल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
ऑनलाईन अर्ज कसा करावा, तसेच या योजनेची तपशीलवार कार्यपध्दती याची माहिती या वेब पोर्टलवर असणार आहे. हे वेब पोर्टल कार्यन्वीत झाल्यानंतर सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी याबाबत आपल्या स्तरावर संपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना देण्यात आल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक २०२१११२६१६१२२१०५१९ दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी निर्गमीत केलेला आहे.