/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२९: भोंग्यांचे नव्हे; तर राज्यातील जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज येथे लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलिस मदत केंद्राला भेट देऊन तेथील जवानांशी संवाद साधला. त्यानंतर गडचिरोलीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी आ.धर्मरावबाबा आत्राम, आ. मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते. राज्यातील जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, भोंग्यांचा नाही, असे पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली. परंतु जनतेच्या रोजीरोटीचे प्रश्न सुटले नाहीत. इतक्या वर्षांत भोंग्याचा विषय आला नव्हता. मात्र, आताच तो कसा आला, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. भाजप आणि मनसेच्या भविष्यातील युतीसंदर्भात पवार म्हणाले की, सत्तेसाठी अशा आघाड्या अनेकदा होत असतात. परंतु त्या फार काळ टिकत नाही.
अलीकडेच शासनाने मोहफुलांपासून मद्यनिर्मितीला मान्यता दिली आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्यात येणार नाही. मात्र, मोहफुलांवर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी स्थानिकांपैकी कुणी पुढे आल्यास सरकार त्यास नक्की मदत करेल, असे सांगितले. अनेक अडचणींना तोंड देत नक्षलग्रस्त भागातील जवान काम करीत आहेत. केंद्र सरकारच्या ६० टक्के आणि राज्य सरकारच्या ४० टक्के निधीतून जिल्ह्यात पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यात येईल. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नागरिकांची हत्या झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहितीही श्री.पवार यांनी दिली.
शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत वाढ केली असून, रेल्वे आणि विमानतळासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात २० हजार कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प उभारण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले.