गडचिरोली | --°C | --°C |
ब्रम्हपुरी,ता.१०: सामाजिक चळवळ चालविताना डॉ.बाबासाहेबांनी नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले, असे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रा.अशोक गोडघाटे यांनी केले. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मारोतराव कांबळे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
ब्रम्हपुरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कवी इ.मो.नारनवरे, आ. मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते. प्रा.गोडघाटे यांनी गोलमेल परिषदेत बाबासाहेबांनी मांडलेली भूमिका, पुणे करार, बाबासाहेबांची घटना समितीतील भाषणे आणि त्यांनी विविध विषयांवर लिहिलेले ग्रंथ यांचा सखोल संदर्भ देत बाबासाहेबांनी राष्ट्रहिताला कसे प्राधान्य दिले, याचे विवेचन केले.
त्यावेळी ‘बाबासाहेबांचे स्वातंत्र्यासाठी योगदान काय’, असा विचारला जात होता. मात्र, बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत उपस्थित राहून गांधीजींच्या ‘चले जाव’, चळवळीच्या अनेक वर्षांआधी इंग्रजांना हा देश सोडून जा, असे ठणकावून सांगितले, असे प्रा.गोडघाटे म्हणाले. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधी यांचे प्राण वाचवून राष्ट्रभक्तीचाच परिचय करुन दिला. ‘अनिहिलेशन ऑफ कास्ट’,या ग्रंथाच्या माध्यमातून जातीप्रथेचे निर्मूलन करुन बाबासाहेबांना हा देश बळकट करायचा होता, असेही प्रा.अशोक गोडघाटे यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी देशात बाल विधवांची संख्या किती होती, याची विस्तृत आकडेवारी देत प्रा.गोडघाटे यांनी बाबासाहेबांनी संसदेत मांडलेल्या हिंदू कोडबिलाद्वारे बालविवाहावर बंदी घातली, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.देवेश कांबळे, तर संचालन प्रा.सरोज शिंगाडे, तरआभार प्रदर्शन दीपांकर कांबळे यांनी केले.
ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार
सकाळी ९ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून केक कापून मारोतराव कांबळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दुपारी दोन वाजता रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली मारोतराव कांबळे व खोरिपाचे प्रदेशाध्यक्ष भाऊ निरभवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना शाल व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जीवन बागडे, मिलिंद मेश्राम, प्रशांत डांगे, पदमाकर रामटेके, मिलिंद रंगारी, नरेश रामटेके, विजय पाटील आदींनी सहकार्य केले.