गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२१: वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी यांनी पक्षाचा दुपट्टा घालून तरारे यांचे स्वागत केले.
जिल्हाध्यक्ष म्हणून आपण पक्षाची ध्येय धोरणे चांगल्याप्रकारे राबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथे आपल्यावर अन्याय होत असल्याचे दिसून आले. पक्षांतर्गत बरेच राजकारण आहे. शिवाय बहुजनांच्या कल्याणासाठी स्थापन झालेली वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचे लक्षात आल्याने आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे दुर्योधन तरारे यांनी सांगितले. भविष्यात वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा महासचिव समशेरखाँ पठाण, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष दामदेव मंडलवार, कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अनुसूचित जाती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अपर्णा खेवले, हरबाजी मोरे, राकेश रत्नावार, घनश्याम वाढई यांच्यासह अनय कार्यकर्ते उपस्थित होते.
पदाच्या लालसेपोटीच तरारे गेले: वंचित आघाडी
कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना पक्षाने दुर्योधन तरारे यांना जिल्हाध्यक्ष बनविले होते. परंतु वरिष्ठांनी दिलेला एकही कार्यक्रम त्यांनी राबविला नाही. नगर पंचायत निवडणुकीत त्यांनी एकही उमेदवार उभा केला नव्हता. पक्षाची जबाबदारी योग्य रितीने पार पाडण्यात ते सपशेल अयशस्वी ठरले. म्हणूनच मागच्या आठवड्यात पक्षाने जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. पुढे नवीन कार्यकारिणीच्या मुलाखतीलाही ते आले नाहीत. पदाच्या लालसेपोटीच ते पक्ष सोडून गेले. त्यांच्या सोबत एकही कार्यकर्ता गेला नाही वा जाणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.