गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२: जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सिरोंचा तालुक्यात पूर आला होता. या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आज केंद्रीय पथक सिरोंचा येथे आले होते.
या पथकात केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे उपसचिव रूपकदास तालुकदार, कृषी विभागाचे संचालक ए.एल वाघमारे, रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर यांचा समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या पथकातील अधिकाऱ्यांनी सिरोचा,आरडा, मुगापूर, मद्दीकुंठा आणि मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. तसेच शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवून आवश्यक ती प्रकिया तातडीने करण्याची ग्वाही पथकातील अधिकाऱ्यांनी आपद्ग्रस्तांना दिली.
त्यानंतर केंद्रीय पथकाने गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संबंधित सर्व विभागांच्या विभागप्रमुखांकडून पूरबाधित नुकसानीची माहिती जाणून घेतली.