गडचिरोली | --°C | --°C |
अहेरी,ता.२१: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून, आदर्श राज्यकर्ते होते. त्यांनी सर्व धर्मातील लोकांना समान न्याय दिला. परंतु त्यांची इतरांशी तुलना करुन काही मंडळी समाजात दुही निर्माण करीत आहेत, अशी टीका शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात केली.
रविवारी (ता.२०) अहेरी येथे आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. कन्यका मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला शिक्षक भारतीचे राज्य समन्वयक अतुल देशमुख,राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, भाऊराव पात्रे, संजय खेडीकर,किशोर वरभे, सपन मेहरोत्रा उपस्थित होते.
आ.पाटील पुढे म्हणाले, आज आपल्या पुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे ठाकले आहेत. परंतु त्याकडे लक्ष न देता काही लोक बेताल वक्तव्य करीत आहेत.शिक्षण क्षेत्रदेखील पूर्णपणे खासगी करणाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले आहे. पटसंख्येच्या आधारे शाळा बंद करण्याचा डाव हा त्याचाच एक भाग आहे, असेही आ.पाटील म्हणाले. शिक्षकांच्या समस्यांशी सरकारला काही देणे घेणे नाही. संविधानाची मूल्ये पायदळी तुडविली जात असून,सत्ताधाऱ्यांचा हा डाव वेळीच उधळून लावावा, असे आवाहनही आ. पाटील यांनी यावेळी केले.