गडचिरोली | --°C | --°C |
1942 मध्ये राष्ट्रपिता म़गांधींनी 'चले जाव' आंदोलन छेडल्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजेच 1943 मध्ये देसाईगंज येथे हाजी मोहम्मद रफी यांच्या नेतृत्वात मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी जामा मशिदीची उभारणी करण्यात आली. इंग्रज राजवटीपासून असलेली ही जामा मशिद शहरातील मुस्लिम बांधवांसाठी श्रद्धास्थान बनली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यांपैकी देसाईगंज शहरात मुस्लिम बांधवांची संख्या अधिक आहे. हा समाज सर्व जातीधर्माच्या लोकांशी गुण्यागोविंदाने राहत असून, सामाजिक सलोखा राखण्यात मुस्लिम बांधवांचे सहकार्य नेहमीच लाभत आले आहे. 1960 मध्ये देसाईगंजच्या जामा मशिदीची चांदा धर्मदाय आयुक्तांकडे रीतसर नोंदणी करून सईद अख्तर हाजी मोहम्मद रफी यांनी मशिदीच्या ट्रस्टचे अध्यक्षपद भूषविले होते. वारसा मास्क, मदरसा, कब्रस्तान टस्ट्र असे नाव देण्यात आले़ यात नमाज अदा करणे, मुलांना अरबियाची तालीम व प्रेताचा दफनविधी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या ट्रस्टद्वारे पार पाडले जाते़ निकाहची माहिती व रीतसर नोंदणी केली जाते. बैतुल मालद्वारे गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश व शालेय साहित्य पुरविण्यात येते. गोरगरिबांचे विवाह कार्य व बेवारस प्रेतांसाठीचा खर्चही ट्रस्ट उचलते. रमजान ईद, बकरी ईद या पवित्र सणांच्या वेळी इदगाहमध्ये व्यवस्था करण्यात येते. हिंदू बांधवांच्या सणांमध्येही मुस्लिम बांधव हिरीरीने सहभागी होतात. अलिकडच्या काळात इफ्तार पार्टीचेही आयोजन केले जाते. यात विविध जाती, धर्माच्या नागरिकांना बोलावून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचे कार्य मुस्लिम बांधव करीत आहेत.