गडचिरोली | --°C | --°C |
'सुनी पुकार दातार प्रभू गुरुनानक अजमको पटाया, सद्गुरुनानक प्रगटया मिट्टी धूर जगचानन हुआ', अर्थात दु:ख व हिंसेवर मात करण्यासाठी परमात्म्याने सद्गुरुनानक यांना पृथ्वीतलावर पाठविले आहे. समता, बंधुत्व, प्रेम व अहिंसेचे पुजारी असणाऱ्या आणि जगाला अहंकाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुनानकांचा सर्वधर्मसमभावाचा संदेश स्वातंत्र्यपूर्व काळापासून देसाईगंज येथील शीख बांधव गुरुद्वारातून समाजाला देण्याचे काम करीत आहेत.
गुरुनानकांचा जन्म पाकिस्तानातील तलवंडी येथे 540 वर्षांपूर्वी झाला़ त्या दिवशीपासून शीख बांधव हा दिवस 'प्रकाश दिन' म्हणून साजरा करतात. स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याची निमिर्ती होण्याआधीपासून देसाईगंज शहरातील गुरुद्वारा शीख बांधवांसाठी श्रद्धेचे स्थान बनलेले आहे.
गुरुद्वाराची देखभाल करणारे पुजारी गुरुमितसिंग अरोरा यांनी येथील गुरुद्वाराची स्थापना जवळपास 75 वर्षांपूर्वी म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी केली. रेल्वेस्थानकाला लागूनच ब्रम्हपुरीकडे जाताना रस्त्याच्या अगदी उजव्या बाजूलाच जिल्ह्यातील एकमेव व शीख बांधवांसाठी श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गुरुद्वाराची इमारत डौलाने उभी आहे. देसाईगंज शहरात शीख बांधवांची संख्या जवळपास दोनशेच्या घरात आहे. गुरुद्वारा समितीद्वारे त्याची देखभाल करून विविध उपक्रम राबविले जातात. या समितीत अध्यक्ष डॉ. निर्मलसिंह टुटेजा, उपाध्यक्ष अजितसिंह सलुजा, सचिव लालसिंह खालसा, कोषाध्यक्ष सतपालसिंह मक्कड यांचा समावेश आहे.